मुंबई | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. टाटा समूहाची (Tata Group) विमान कंपनी एअर इंडिया (Air India Recruitment) मोठ्या प्रमाणावर भरती सुरू करण्याच्या तयारीत आहे.
मागील काही दिवसांपूर्वी केवळ मुलाखतीच्या आधारे 495 पदांची भरती (Air India Recruitment) करणार असल्याची माहिती दिली होती. आता कंपनी 1000 हून अधिक भरती करणार असल्याची माहिती आहे. या भरती अंतर्गत वैमानिक, कॅप्टन आणि ट्रेनर्स या पदांचीही भरती केली जाणार आहे.
टाटा समूह आपल्या ताफ्याचा आणि नेटवर्कचा विस्तार करत आहे ज्यामुळे मोठ्या प्रमाणात भरती सुरू आहे. सध्या Air India विमान कंपनीत 1800 हून अधिक पायलट्स कार्यरत आहेत. आता गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार, वैमानिकांच्या संख्येनुसार एक हजारांहून अधिक जागा भरल्या (Air India Recruitment) जाणार आहे.
टाटा समूहाच्या या कंपनीनं बोईंग आणि एअरबससह 470 विमानांची ऑर्डर दिली आहे. एअरबसला दिलेल्या ऑर्डरमध्ये 210 A320/321 Neo/XLR आणि 40 A350-900/1000 चा समावेश आहे. याशिवाय कंपनीनं बोइंगला 190 737-मॅक्स, 20 787 आणि 10 777 ची ऑर्डर दिली आहे. एअर इंडियाच्या म्हणण्यानुसार त्यांच्या ताफ्यात 500 हून अधिक विमानांचा समावेश होणार आहे. यामुळे ते आपल्या A320, B777, B787 आणि B737 च्या ताफ्यासाठी कॅप्टन, फर्स्ट ऑफिसर आणि ट्रेनर्सची भरती करत आहे.
एअर इंडियाकडून ही भरती अशा वेळी केली जात आहे जेव्हा त्यांच्या विद्यमान वैमानिकांनी सॅलरी स्ट्रक्चर आणि सेवा शर्तींबाबत कंपनीच्या अलीकडील निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे. एअर इंडियानं 17 एप्रिल रोजी पायलट आणि केबिन क्रूसाठी नवीन सॅलरी स्ट्रक्चर सादर केले. इंडियन कमर्शियल पायलट असोसिएशन (ICPA) आणि इंडियन पायलट गिल्ड (IPG) या दोन पायलट युनियननी कंपनीच्या या पॉलिसीला नकार दिला आहे.
कंपनी कामगार कायद्यांचं उल्लंघन करत असून हे स्ट्रक्चर तयार करण्यापूर्वी त्यांचा सल्ला घेतला गेला नसल्याचा युनियनचा आरोप आहे. एअर इंडियाच्या 1500 हून अधिक वैमानिकांनी या समस्येचे निराकरण करण्यासाठी रतन टाटा यांना पत्र लिहिले आहे.