मुंबई | आकाशातून जाणारे विमान पाहिले की आजही अनेकजण त्याकडे नजर लावून बसतात. त्यातच जर एखाद्याला पायलट व्हावे असे वाटत असेल तर त्यांच्या स्वप्नांना नक्कीच दाद द्यावी लागते. म्हणूनच पायलट म्हणून काम करण्याची इच्छा असणाऱ्या आणि हवाई वाहतुकीशी (Air India Recruitment) संबंधित क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
सध्या टाटा उद्योगसमुहाच्या मालकीची असलेल्या एअर इंडिया कंपनीमध्ये हजारो जागांसाठीची भरती जाहीर करण्यात येणार आहे. उपलब्ध अहवालांमधील माहितीनुसार, कंपनीला ६ हजार ५०० पेक्षा जास्त पायलट, अभियंते आणि क्रू मेंबर्सची गरज असून त्यासाठी लवकरच भरती (Air India Recruitment) केली जाणार आहे.
टाटा उद्योगसमूहाने मागील वर्षी जानेवारी महिन्यात तोट्यात असलेली एअर इंडिया कंपनी आपल्या ताब्यात घेतली, तेव्हापासून या कंपनीच्या कार्यपद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. नुकतेच एअर इंडियाने आपल्या पाच वर्षांच्या परिवर्तन योजनेअंतर्गत, मागील सहा महिन्यांमध्ये ३ हजार ८०० नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली असून कर्मचाऱ्यांसाठी विविध २९ धोरणेही लागू केली असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
कंपनीकडून माहिती तंत्रज्ञानासाठी २० कोटी अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करण्यात येत आहे. तर कंपनीने ४७० विमानांच्या खरेदीसाठी मागणी नोंदवली आहे. एअर इंडियाच्या परिवर्तनासाठी टाटा समूहाने ‘विहान डॉट एआय’ योजना लागू केली आहे. सुरुवातीच्या सहा महिन्यांमध्ये अनेक आघाड्यांवर प्रगती झाली असून वाढीसाठी मजबूत पाया तयार करण्याच्या दृष्टीने मोठा प्रवास पूर्ण करण्यात आला आहे, असे एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन यांनी सांगितले आहे.
आता कंपनीकडून विविध पदासांठीची मोठी भरती जाहीर करण्यात येणार आहे. या भरती अंतर्गत एअर इंडियामध्ये ९०० वैमानिक आणि ४,२०० कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. कंपनीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सेवेचा विस्तार करण्याची योजना आखली असून त्याचाच भाग म्हणून ही भरती केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
एअर इंडिया अंतर्गत होणाऱ्या या भरतीमुळे नोकरीच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या नोकऱ्यांची प्रतिक्षा करणाऱ्यांनी योग्य ती तयारी करून या भरतीस सामोरे गेल्यास हमखास नोकरी मिळणार आहे.