मुंबई | राज्यातील नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूण तरूणींसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाच्या ४३ विभागाअतंर्गत तब्बल पावणेतीन लाखांहून अधिक पदे रिक्त (Maharashtra Govt Job) असून या रिक्त पदांची १ जून ते १५ ऑगस्ट या अडीच महिन्यांत भरती केली जाणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनुसार आता देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापूर्वी म्हणजेच १ जून ते १५ ऑगस्ट या अडीच महिन्यांत ७५ हजार पदांची मेगाभरती (Maharashtra Govt Job) केली जाणार आहे.
भरतीच्या प्रतीक्षेत हजारो तरूणांची वयोमर्यादा देखील संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता मेगाभरतीचा कृती आराखडाच शासनाने तयार केला असून १५ ऑगस्टपूर्वी मेगाभरतीच्या जाहिराती प्रसिद्ध करून प्रक्रिया सुरु होईल, असे सांगण्यात येत आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर दुसऱ्याच महिन्यात (ऑगस्ट २०२२) नवीन सरकारने मेगाभरतीची घोषणा केली होती. कालबद्ध पद्धतीने १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी भरती पूर्ण करण्याचेही जाहीर केले होते. २० ऑक्टोबर २०२२ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट- ब, क आणि गट- ड पदभरतीसाठी टीसीएस, आयबीपीएस या कंपन्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला.
सध्या महसूल, कृषी, शालेय शिक्षण, ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य व गृह, जलसंपदा (पाटबंधारे), महिला व बालकल्याण, सामाजिक न्याय, पशुसंवर्धन अशा महत्वपूर्ण विभागांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही रिक्त पदे वाढली आहेत.
एकाच अधिकऱ्याकडे अनेक आस्थापनांचा पदभार सोपविल्याने ‘निर्णय गतिमान, महाराष्ट्र वेगवान’ला अडचणी येत असल्याची वस्तुस्थिती आहे. दरम्यान, कोरोनानंतर वित्त विभागाने पदभरतीवरील निर्बंध उठवल्याने पदभरतीस सध्या कोणतीही अडचण राहिलेली नाही.
दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका, राजकीय सद्य:स्थिती, राज्यात वाढलेली बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर सरकारला मेगाभरती करावीच लागणार आहे. त्यादृष्टीने भरतीचा कृती आराखडा युद्धपातळीवर तयार करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.