तलाठी भरती अपडेट: डिसेंबर महिन्यात १७०० तलाठ्यांची भरती प्रक्रिया, तयारीला लागा | Talathi Bharti 2025

Talathi Bharti 2025: महाराष्ट्रातील तलाठी भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या हजारो उमेदवारांची प्रतीक्षा अखेर संपणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, तलाठी भरतीची हालचाल पुन्हा सुरू झाली असून डिसेंबर महिन्यात भरती प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे.

सध्या महसूल विभागात तलाठ्यांच्या जागांची मोठ्या प्रमाणात रिक्तता आहे. राज्यात सुमारे १७०० हून अधिक पदे रिक्त असून, यामुळे विद्यमान तलाठ्यांवर कामाचा प्रचंड ताण निर्माण झाला आहे. एका तलाठ्याकडे सध्या तीन ते चार गावांचा कारभार असतो. त्यामुळे नागरिकांच्या जमीन, महसूल आणि विविध कागदपत्रांशी संबंधित कामांना मोठा विलंब होत आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने या भरतीला गती देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. डिसेंबरअखेरीस ही भरती प्रक्रिया सुरू होण्याची दाट शक्यता असल्याचे महसूल विभागातील सूत्रांनी सांगितले. नव्या भरतीमुळे विभागातील कामकाज सुलभ होईल, तसेच नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, महसूल विभागातील पात्र सेवकांसाठी या भरतीत राखीव जागा ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांना याचा थेट लाभ मिळेल. तसेच, ‘पेसा’ क्षेत्रातील गावांमध्ये कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी कंत्राटी तलाठ्यांची नेमणूक करण्याचाही विचार सुरू आहे.

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी
गेल्या दोन वर्षांपासून राज्यात तलाठी भरती न झाल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये नाराजी होती. दरवर्षी हजारो विद्यार्थी तलाठी भरतीसाठी अभ्यास करतात, परंतु सततच्या विलंबामुळे अनेकजण निराश झाले होते. आता या नव्या हालचालीमुळे त्यांच्यात पुन्हा आशेचा किरण दिसत आहे.

ग्रामीण भागातील तरुण या भरतीकडे विशेष लक्ष ठेवून आहेत. कारण तलाठी ही नोकरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्थैर्य देणारी आणि प्रतिष्ठेची मानली जाते. त्यामुळे भरती सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणात अर्जदार सहभागी होण्याची शक्यता आहे.

जिल्हा पातळीवरील पदभरतीची गरज
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तलाठ्यांची पदे रिक्त आहेत. एका तलाठ्याकडे दोन सज्जांचा कारभार देण्यात आला असून, त्यामुळे ते दररोज सर्व गावांमध्ये उपस्थित राहू शकत नाहीत. परिणामी शेतकऱ्यांना आणि नागरिकांना त्यांच्या कामांसाठी अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागते.

ही भरती प्रक्रिया झाल्यानंतर महसूल विभागातील कामाचा ताण कमी होईल आणि नागरिकांची जमीन, उत्पन्न प्रमाणपत्र, 7/12 उतारे, वारसा दाखले यांसारखी महत्वाची कामे वेगाने आणि कार्यक्षम पद्धतीने मार्गी लागतील. राज्य शासनाकडून लवकरच अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.